बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली: नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील धौलीगंगा, ऋषीगंगा व अलकनंदा या नद्यांना महापूर आला. तर या महापुरात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला असून १७० कर्मचारी बेपत्ता आहेत. त्यातील १० जणांचे मुतदेह मिळाले असून शोधमोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी या दूर्घटनेबाबत ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गंगा नदी आणि त्याच्या मुख्य उपनद्यांवर धरणं बांधून वीजनिर्मिती करण्यास विरोध होता असं त्यांनी म्हटलं आहे. हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय आहे. या प्रलयामध्ये ऋषिगंगा नदीवर बनवण्यात आलेला वीजप्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला. या पुराचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. मी गंगा मातेला प्रार्थना करते की तिने सर्वांचं रक्षण करावं, अशी या ट्विट मध्ये उमा भरती यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून या कुटुंबीयांना दोन लाखांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
उमा भरती यांनी केलेल्या ट्विट मध्ये असे म्हंटले आहे की, उत्तरकाशीमधून आज मी हरिद्वारला पोहचले आहे. हरिद्वारमध्येही अलर्ट जारी करण्यात आला असल्याने या प्रलयाचा फटका हरिद्वारलाही बसू शकतो. ऋषिगंगा नदीवर झालेला हा अपघात हा चिंतेचा विषय असून यामधून इशारा मिळत आहे. मंत्री असताना मंत्रालयाच्यावतीने हिमालयातून उत्तराखंडमध्ये येणाऱ्या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये त्यांनी हिमालय हे खूपच संवेदनशील ठिकाण असून गंगा आणि तिच्या प्रमुख उपनद्यांवर वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधली जाता कामा नये असं म्हटलं होतं अशी माहिती उमा भारती यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. तसेच उत्तराखंडला धरणं न बांधल्याने १२ टक्के कमी वीज मिळते ती राष्ट्रीय ग्रीडमधून पुरवण्यात यावी असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचं त्यांनी सांगितले.
उत्तराखंड ही देवभूमि आहे. येथील लोकं खूप कठीण परिस्थितीमध्ये राहत असून तिबेटला लागून असलेल्या भारताच्या सीमांचे संरक्षण करतात. त्या सर्वांच्या रक्षणासाठी मी देवाकडे प्रार्थना करते असं उमा भरती यांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिलं आहे.
उत्तराखंडमधील घटना दुर्दैवी : पंतप्रधान
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या महापुरामध्ये ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील दीडशेहून अधिक कर्मचारी वाहून गेले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या नैसर्गिक आपत्तीत सारा देश उत्तराखंडच्या पाठीशी उभा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील वाहून गेलेल्या कर्मचाऱ्यांना शोधल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे यासाठी जोशीमठ येथे ३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच डेहराडून, श्रीनगर, हृषिकेश येथील रुग्णालयांमधील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.