मुंबई : Rashmi Uddhav Thackeray | ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपासोबत (BJP) जाण्यास इच्छूक होते, त्यांचे राजकारण कसे वाईट आहे, इत्यादी माहिती सातत्याने अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) समोर आणली जात आहे. आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी नवीन माहिती समोर आणली असून यामध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह (Sanjay Raut) शरद पवारांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले होते, असे पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटले की, २०१९ साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील अशी भूमीका घेतली होती. कारण त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता, त्यावेळी एकनाथ शिंदे यांना करणार होते. मात्र रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना करावे असे ठरले. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला.
त्यामुळेच भाजपसोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केले असा दावा करतात. परंतु शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे लागले कारण सर्व आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती, असा दावा पाटील यांनी केला.
उमेश पाटील म्हणाले, २००४ साली शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतले नाही. त्यावेळी अजित पवार एक वेळा खासदार आणि २ वेळा आमदार होते याचाच अर्थ ते सक्षम नेते होते. पक्षात मातब्बर नेते असूनही शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतले नाही. भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असेल तर त्यासाठी दुसरे नेतृत्व पक्षात नको म्हणून त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही.
उमेश पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे नेहमीचे रडगाणे आहे. त्यांना जर यंत्रणेवर विश्वास नाही तर कोणत्या आधारावर छाती टोकून सांगत आहात की आमच्या जास्त जागा येतील. मतदान कमी का झाले याची चौकशी व्हायला समिती नेमली आहे, असे म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली.