मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले आणि जो अहवाल दिला, त्यात दर्शविल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. मात्र, शुक्लांना फोन टॅपिंगचे अधिकार कोणी दिले? त्यांनी कोणाची परवानगी घेतली होती? या बाबी गंभीर असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले, रश्मी शुक्ला यांच्या अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईला होईल, असे लिहले आहे. पण त्यांची बदली रेल्वेत झाली. विनय कुमार चौबे यांची बदली पुण्याला होणार आहे असे आहे. मात्र, ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली. संजयकुमार ठाण्याला आयुक्त म्हणून जातील, असे लिहिले होते, त्यांची बदली झालीच नाही. त्यामुळे त्या अहवालात सांगितल्याप्रमाणे काही घडलेच नाही. अंबानीच्या घरासमोरील स्फोटक ठेवल्याचे आढळले. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या झाली. एटीएसचा तपास अंतिम टप्प्यात असताना एनआयएचे पत्र आले. आम्हाला चौकशी थांबवण्यास सांगण्यात आले. आमची चौकशी अंतिम टप्प्यात असताना ती थांबवण्यात आल्याचे आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र माध्यमांमध्ये आल्यापासून एनआयएकडून माहिती बाहेर येणे कमी झाले आहे, असा टोला लगावत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांत कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मूळ विषय अंबानींच्या घरासमोर जिलेटिन कोणी ठेवले हा आहे. त्या चौकशीपासून लक्ष विचलित करण्याचे काम फडणवीस जाणीवपूर्वक करीत आहेत.