मुंबई बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सोबत घेतले तरच आपण कॉंग्रेससोबत जाऊ अशी भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला ४० जागांचा अल्टीमेटम दिल्यानंतर आता राजू शेट्टींनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी मात्र वाढली आहे. तर वंचितला डावल्यण्याची लोकसभा निवडणूकीतल्या सारखी चूक केल्यास कॉंग्रेसला पुन्हा महागात पडू शकते. मुंबईत पत्रकारांनी बोलताना राजू शेट्टी यांनी हा इशारा दिला.
वंचित बहुजन आघाडी आणि मनसे सोबत असेल तरच काहीतरी फायदा होऊ शकतो. शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धूसफूस सुरु आहे. उघड नसली तरी धुसफुस सुरु आहे. त्यासोबतच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी वंचित आणि मनसेला सोबत घेणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसला वंचितचा विरोध आहे. मनसेसोबत नको म्हणणारी काँग्रेस आता लोकसभेतील पराभवानंतर शहाणी झाली आहे. त्यांना मनसे आता सोबत हवी आहे. त्यात प्रकाश आंबेडकर काँग्रेसला ४० जागा घेऊन आघाडी करण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मनसेसाठी आग्रही असलेले राजू शेट्टी राष्ट्रवादी बाबत मात्र काहीच बोलत नाहीत.