बहुजननामा ऑनलाइन टीम – आज काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन पक्षाकडून करण्यात आलं. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींना लक्ष्य करण्यात आलं. दरम्यान, आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
खासदार राजीव सातव पुढे म्हणाले, ‘दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. असं असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भाजप नेते म्हणतात. पण, पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,’
देशावर कोरोनाचं संकट येणार असा धोक्याचा इशारा राहुल गांधींनी फेब्रुवारी महिन्यातच दिला होता. पण राहुल यांनी सतर्कतेचा इशारा देऊनही सरकारनं काय केलं?, असा सवाल सातव यांनी उपस्थित केला. सगळे प्रश्न राहुल यांना विचारले जातात. पण पंतप्रधान ६ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेत नाहीत, असं सातव म्हणाले
भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआयच्या नोटीस येतात. भाजप नेत्यांना मात्र कधीही ईडी, सीबीआय नोटीस बजावत नाही. ईडी, सीबीआयनं आता त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयात हलवावं. म्हणजे त्यांचा संवाद जास्त चांगला राहील. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली आहे. त्यावरूनही सातव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.