श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलानंतर सर्वप्रथम रहिवाशी प्रमाणपत्र घेणारे सतपाल निश्चल दहशतवादाला बळी पडले आहेत. 65 वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येने व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. निश्चल यांच्या शेजार्यांनी सांगितले की, ते सरायबालामध्ये 17 वर्ष भाडेकरू म्हणून राहात होते. निश्चल यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर खुप प्रगती केली आणि श्रीनगरचा पॉश भाग असलेल्या इंदिरानगरमध्ये आपले घर बांधले. ते येथे मागील 25 वर्षांपासून राहात होते.
अधिकृत सूत्रांनुसार, भूमी कायदा झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबाला काही दिवसांपूर्वीच डोमिसाइल सर्टिफिकेट जारी झाले होते.
हत्येद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न
सूत्रांनुसार, डोमिसाइल सर्टिफिकेट निश्चल यांच्या हत्येचे कारण ठरले आहे. दहशतवाद्यांनी या हत्येद्वारे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे की, काश्मीरच्या बाहेरील लोकांनी जर येथील रहिवाशी दाखला घेण्याचा विचार केला तर त्याचे परिणाम असे होतील. आर्टिकल 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये राहात असलेल्या बाहेरच्या लोकांना येथे प्रॉपर्टी खरेदी करणे आणि रहिवाशी दाखला घेण्याचा हक्क मिळाला होता. याचा काश्मीरमध्ये जोरदार विरोध सुद्धा करण्यात आला होता.
पोलिसांचा तपास सुरू
पोलीस सूत्रांनुसार, निश्चल यांची हत्या दशहतवादी हल्ल्यात झाली आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. मात्र, कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, बहुतांश लोकांचे म्हणणे आहे की, ही हत्या बाहेरील लोकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे.
निश्चल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये सरायबालामध्ये शेजारी असलेले शाबिर अहमद यांनी सांगितले की, निश्चल आणि आमच्या कुटुंबाने एकत्र अनेक सण साजरे केले आहेत. दुसरे शेजारी खालिद अहमद यांनी सांगितले की, आम्हाला निश्चल यांच्या हत्येने धक्का बसला आहे. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते.