पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. काही लोकांना मागिल कित्येक महिन्यापासून पगार मिळालेला नाही, तर काहींना निम्म्या पगारावर काम करावे लागत आहे. अशातच शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फीसाठी तगादा लावला जात आहे. कोरोनामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले असेल तर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण वर्षाची फी माफ करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या Bharatiya Janata Yuva Morcha वतीने करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे Bharatiya Janata Yuva Morcha पुणे अध्यक्ष राघवेंद्र मानकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना निवेदन दिले आहे.
कोरोनामुळे Corona परिस्थिती गंभीर झाली असताना शाळेच्या व्यवस्थापनाकडून अनेक पालकांना फीसाठी तगादा लावला जात आहे. विद्यार्थ्यांचे रिझल्ट अडवले जात आहेत. ऑनलाइन वर्गातून किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकले जात आहे. मुलांच्या भविष्यासाठी पालक या सर्व गोष्टी सहन करत आहेत. याचा गैर फायदा शाळेच्या व्यवस्थापनाकडून घेतला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाने शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले आहे. यामध्ये सात मागण्या केल्या आहेत. तसेच शाळा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आढळून आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्या
1. कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक फायद्यापासून वंचित ठेवले जाऊ नये.
2. फी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने यांनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हप्त्याने फी भरण्याची मुभा द्यावी.
3. उशिरा फी भरणाऱ्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड आकारु नये.
4. ऑनलाइन क्लासरुम मधून विद्यार्थ्यांना काढले जाऊ नये. (ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे.)
5. ज्या सुविधांचा वापर या वर्षात झालेला नाही त्याबाबत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाऊ नये (उदा. ग्राउंड शुल्क, कॉम्प्युटर लॅब शुल्क इ.)
6. शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला आडवणे, असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
7. गेल्या 1 वर्षात यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाले असेल, तर अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.