पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात कडक लॉकडाऊन आहे अन् त्याची पुणे पोलीस “नियमानुसार” पालन करत कारवाई करत असताना प्रसिद्ध अश्या “गोळीबार” मैदानात तरुणांची क्रिकेटसाठी तुफान गर्दी होत आहे. दिवसभर हे मैदान तरुणांनी भरलेले असते. तर, अनेकजण मास्क विनाच दिसून येतात. त्यामुळे खरच शहरात संचारबंदी आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात 15 दिवसांची कडक संचारबंदी आहे. त्यातही शनिवारी आणि रविवारी तर पूर्ण बंद असतं. केवळ मेडिकल सेवा सुरू असते. पण रस्त्यावरची गर्दी पाहून खरच लॉकडाऊन आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस 24 तास काम करत आहेत. कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण, इशाऱ्यानंतर देखील शहरातील चित्र काही बदलले असे दिसत नाही. कारण रस्त्यावर गर्दी अन् वाहने दिसत आहेत.
आता रस्त्यावरची ही परिस्थिती दिसत असताना दिवसभर गोळीबार मैदानात शंभरएक तरुण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. फुल्ल गर्दी अन् कालवा असे चित्र दिसत आहे. याठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा तर उडालाच आहे, पण मास्क देखील अनेकजण न घालता दिसून आले आहेत. त्यामुळे गाव बंद अन मैदान भरलेली अशीच, स्थिती पुण्याची झाली आहे. कारवाई अन नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना गोळीबार मैदान अन् त्यावरील गर्दी दिसत नाही का, असे आता नागरीक विचारू लागले आहेत.