बहुजननामा ऑनलाइन – पुर्ववैमनस्यातून भरदिवसा कोंढव्यात सराईत गुन्हेगारावर तिघांनी हल्ला करुन खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता; त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिसोळीतील बालाजी गॅरेजसमोर हा हल्ला झाला होता. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
सागर दादा औताडे (वय २३, रा. औताडेवाडी ) असे खून झालेल्याचे नाव आहे. पुरुषोत्तम मंडावळे (वय २५, रा. वडाची वाडी ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर मारामारीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपुर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता.
शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सागर दुचाकी दुरुस्त करण्यास बालाजी गॅरेजमध्ये आला होता. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी सागरवर शस्त्राने वार केले. यात सागर गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे प्राथमिक तपासातूूून समोर आले आहे. अधिक माहिती घेतली जात असल्याचे सहाय्यक निरीक्षक स्वराज पाटील यांनी सांगितले.