पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसर गाडीतळ ते पंडित जवाहरलाल नेहरू मंडई दरम्यान सकाळी भाजीविक्रेत्यांबरोबर फेरीवाल्यांची खच्चून गर्दी होत आहे. यामध्ये भरीस भर म्हणून की काय पालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागाचे वाहनही मंगळवारी (दि. २५ मे २०२१) सकाळी १०.३० च्या सुमारास उभे असून, तेथे भाजीविक्रेत्यांसह फेरीवाल्यांची खच्चून गर्दी झाली होती. त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही, कारवाई करायची नव्हती, तर वाहन आणि कर्मचारी येथे कशासाठी आले होते. अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी कारवाई करण्यासाठी आहेत की, गर्दी करण्यासाठी आहेत, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजीपाला, किराणा माल, तसेच स्वीट होम आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांना खरेदी-विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा असे किमान नियम पाळले नाही, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना सामान्य नागरिकांचीही आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागाची कारवाई नेमकी कधी आणि कोणावर केली जाते, त्यासाठीचे नियम आणि निकष काय आहेत, याचा खुलासा करावा, अशी विचारणा ससाणेनगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर यांनी केली आहे.
भाजीविक्रेते आणि फेरीवाले म्हणतात सोलापूर रस्त्यावर हडपसर-गाडीतळ ते मंडई दरम्यान भाजीविक्रेते-फेरीवालेच दिसतात का, इतर ठिकाणीही हा भाजीविक्री, फळविक्री व्यवसाय सुरू आहे, दुकानांचे शटर बंद करून मागच्या दाराने व्यवहार सुरू आहेत, क्षेत्रीय कार्यालयाच्या बाजूला गोडाऊन आहेत, तेथे सर्रास खरेदी-विक्री होते, त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही, याला काय म्हणायचे, आम्ही जगायचे तरी कसे, तुम्हीच मार्ग सूचवा, गाडीतळ-मंडई दरम्यान मागिल अनेक वर्षांपासून फेरीवाले, भाजीविक्रेते बसत आहेत. सुरुवातीलाच कडक कारवाई केली असती, तर कोणी बसले नसते. आता तुम्ही नावाला कारवाई करता, कारवाईचे वाहन गेले की लगेच पाठीमागे सर्व भाजीविक्रेते, फेरीवाले बसतात. त्यासाठी या व्यावसायिकांना जागा निश्चित करून द्या, त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करू, असे भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांनी सांगितले. केश कर्तनालय, पोतराज, रोजंदारीवरील कष्टकरी, हॉटेल कामगारांवर उपासमार आली, भाजीपाला विक्रेते-पथारीवाल्यांकडून पावती फाडतात, त्यांच्यावर उपासमारी नाही का, कारवाई करताना कोणी विरोध केला, तर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला, अंगावर आला, शिवीगाळ केली, हे सरकारी कायदे बनवले, असे सांगून गु्न्हा दाखल केला जातो. मात्र, फेरीवाला-भाजीविक्रेता का विरोध करतो याविषयी कोणी समजून घेणार नाही का, असा संतप्त सवाल या मंडळींकडून उपस्थित केला जात आहे.