बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना एका दिवसात ‘जन्म-मृत्यू’चे दाखले मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महानगरपालिकेने नागरिकांना दाखले मिळवताना होणारा त्रास करण्यासाठी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयाचे विकेंद्रीकरण(decentralization) करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतची प्रक्रिया मंगळवार पासून सुरू झाली आहे.
महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयासोबत क्षेत्रीय कार्यालयात महिनोंमहिने पायऱ्या झिजवूनसुद्धा दाखले मिळत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसेच, महापालिकेची ‘नागरी सुविधा केंद्रे’ म्हणजे असुविधांची केंद्रे बनल्याचे चित्र शहरभरात निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत जन्म-मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी व एकाच कार्यालयावरील भार कमी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने, शहरातील पाच क्षेत्रीय परिमंडळनिहाय नागरी नोंदणी पद्धतीने या संगणक प्रणालीत जन्म-मृत्यू घटकांची नोंद करण्याची यंत्रणा कार्यन्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जन्म मृत्यूच्या दाखल्यांसोबत छोट्या-मोठ्या दुरुस्ती करण्यासह इतर कामे परिमंडळ कार्यालयात केली जातील.
प्रचलित पद्धतीस दिली बगल
यापूर्वी रुग्णालयाकडून जन्म मृत्यूची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून कसबा पेठेतील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे जाण्यास (मूळ कागदांसह) दीड महिना कालावधी लागायचा. मग येथील कार्यालयाकडून माहितीचे संगणकीकरण करून दाखल तयार होवून नंतर क्षेत्रीय कार्यालयाकडे, तेथून नागरी सुविधा केंद्रात पाठवला जात. परंतु, आता प्रचलित पद्धतीस बगल देत, प्रत्येक परिमंडळात जन्म-मृत्यू कार्यालयाने तीन जणांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्तीत केली आहे. म्हणून आता तेथेच कागदपत्रांची ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिममध्ये’ कॅम्प्युटरद्वारे इंट्री करणे व त्याठिकाणाहून थेट नागरी सुविधा केंद्रात दाखले वितरणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या महापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे कोरोना टाळेबंदी मुळे निर्माण झालेल्या अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ७ हजार जन्माचे दाखले तर ५ हजार मृत्यू दाखले संगणीकरण करण्याचे काम राहिले आहे. विकेंद्रीकरणाच्या या निर्णयाने परिमंडळ निहाय कामे वाटून देण्यात आली असून, त्यासाठी १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, जन्म- मृत्यू कार्यालयाचे विकेंद्रीकरणाचे काम सुरू असल्याने येतील काही दिवसांत हे काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर रुग्णालयांकडून जन्म-मृत्यूची माहिती परिमंडळ कार्यालयाकडे प्राप्त झाल्यावरती एका दिवसात संगणीकृत दाखल तयार करून तो नागरी सुविधा केंद्राकडे हस्तांतरित करण्यात येईल. त्याठिकाणी नागरिकांना दाखल्याचे विहित शुक्ल भरुन तत्काळ दाखले मिळतील.