मालेगाव : बहुजननामा ऑनलाइन – दाट धुक्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरुच आहे. सटाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आज (शुक्रवारी) पहाटे आणखी एक भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा (Mumbai- Agra) महामार्गावर चांदवडजवळ (Chandwad) खासगी ट्रॅव्हल बस (Private bus) आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, बसनं महामार्गाच्या कडेला उभी असलेल्या टॅक्सी आणि दोन टपऱ्यांना धडक दिली. या घटनेत बस पलटी झाली. धक्कादायक म्हणजे यावेळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचा बस खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. दाट धुक्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मजूर घेऊन जाणारी खासगी बस, गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला पलटी झाली. यात बससह रस्त्याच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि दोन टपऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 75 मजूर होते. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. काही मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धुके असल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ट्रकमध्ये भरलेले गॅस सिलिंडर होते. सुदैवाने गॅस गळती झाली नाही. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.