बहुजननामा ऑनलाइन टीम – उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणारे भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांच्यावर संघातील खेळाडूची निवड करताना धर्मभेद केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आरोपांमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वासिम जाफरने हे सर्व आरोप फेटाळले असून मीडियातून संघटनेचे सचिव माहिम वर्मा यांनी मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले असल्याचे जाफर यांनी म्हंटल आहे. दरम्यान, उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये वासिम जाफर हे एक मोठे नाव असून भारतासाठी त्यांनी ३१ कसोटी सामने खेळले आहेत. हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे देत वासिम जाफर यांनी मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बुधवारी जाफर यांनी त्यांच्यावर केल्या सर्व आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे. इक्बाल अब्दुल्लाला मला संघाचे कर्णधार बनवायचे होते हा आरोप निराधार आहे. वास्तविक मला जय बिस्ताला कर्णधार बनवायचे होते. पण निवड समितीतील काही सदस्य आणि रिझवान शमसाद यांनी इक्बालला कर्णधार बनवण्याचा पर्याय सुचवला. इक्बाल हा संघातील वरिष्ठ खेळाडू असून तो आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याला अनुभव आहे. असे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे मी त्यांच्या सल्ल्याशी सहमत झालो.
संघाच्या प्रशिक्षणा दरम्यान जाफर यांनी मौलवींना आणल्याचा आरोप आहे. तोहि त्यांनी फेटाळून लावला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, डेहराडून येथे शिबीर असताना दोन ते तींन शुक्रवारी मौलवी आले होते. हे मान्य आहे परंतु त्यांना मी बोलावले नव्हते. दरम्यान, इक्बाल अब्दुल्लाने संघाच्या व्यवस्थापकांसह माझी शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी परवानगी घेतली होती. मुळातच प्रशिक्षणानंतर प्रार्थना करण्यात आली. त्यामुळे याला मुद्दा बनवायचे काही एक कारण नाही असेहि जाफर यांनी म्हंटल आहे.