मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या देशातील वातावरण भाजपविरोधी तयार झालेले आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा नवीन प्रयोग करु नये. त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.
देशात भाजपाच्या विरोधात एक मोठे वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीसह इतर लहान पक्ष मिळून सेना-भाजपच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा नवीन प्रयोग करु नये, त्यांनी आघाडीसोबत येण्याचे आवाहन मलिकांनी केले आहे.
काँग्रेस -राष्ट्रवादी आपल्याला १२ जागा देत नाही. तसेत आपण टाकलेल्या अटींवर सहमत होत नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बहुजन वंचित आघाडी सर्व ४८ जागांवर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. त्यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी आपल्या आघाडीचे उमेदवार घोषीत केले. त्या पार्श्वभूमीवर मलिक म्हणाले की, आता ही वेळ राज्यात आणि देशात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि इतर सर्व लहान पक्ष मिळून एकत्र लढण्याची आहे. मात्र, अशा वेळेत प्रकाश आंबेडकरांनी नवीन काही प्रयोग करणे योग्य नसल्याचे मलिक म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील महाआघाडीत यावे यासाठी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही त्यांना भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आघाडीत यावे. राज्यात आता सेना-भाजपाच्या विरोधात प्रचंड मोठे वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा आघाडीला होणार असल्याचे मलिक म्हणाले.