बहुजननामा ऑनलाईन – समान काम समान वेतन देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढला होता. याठिकाणी जमलेल्या शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठीमारात १० ते १५ शिक्षक जखमी झाले. त्यामुळे मैदान परिसरात तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, “मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा विनाअनुदानित आहेत त्या शाळा अनुदानित कराव्यात, ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळां २०% अनुदानित आहेत त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊन कर्तव्यात चालढकल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.” आदी मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढला होता.
राज्यभरातील शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांनाही समान कामाप्रमाणे समान वेतन देण्यात यावं, शंभर टक्के अनुदान देण्यात यावं, अशी मागणी करत उपस्थित हजारो शिक्षक शिक्षिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केला. अचानक झालेल्या लाठीमारीमुळे त्यांच्यात धावपळ झाली. त्यामुळे मैदानावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
विनाअनुदानित शिक्षकांच आंदोलन चिघळळल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी पोहचून मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांनी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळांना शेलार यांनी भेटायला बोलावल्याचं पोलिसांनी मोर्चकऱ्यांना सांगितलं. त्याला मोर्चेकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला. मंत्र्यांनाच आझाद मैदानात बोलवण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. मात्र पोलिसांच्या शिष्टाईमुळे अखेर पाच जणांचं शिष्टमंडळ शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेलं. दरम्यान, उद्या केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक असल्याने या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.