नगर : बहुजननामा ऑनलाईन – रेल्वे स्टेशन भागातील महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून दहा वर्षांपूर्वी सुरु केलेले आंबेडकर विद्यालय बंद करण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत जाऊन गोंधळ घातला त्यामुळे प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सभेत घुसून महापौरांच्या व्यासपीठासमोरच ठिय्या मांडला. अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कायदेशीर बाबीची प्रशासनाने पुर्तता करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा सुरू करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या गोंधळामुळे सभा सुरू होण्यास अर्धातास उशीर झाला. अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कायदेशीर बाबीची प्रशासनाने पुर्तता करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालक व विद्यार्थी सभागृहाबाहेर पडले.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या रेल्वे स्टेशन येथील शाळेत माध्यमिक विभाग सुरू करण्यात आला होता. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मागासवर्गीय, गोर-गरीब विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळाला. मात्र, माध्यमिक विभाग बेकायदेशीर असल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळा बंद केल्यामुळे येथील गोर-गरीब विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
याबाबत तेथील शिक्षकांनी अनेकवेळा प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर महापालिकेच्या सभेत मंगळवारी थेट पालकांनीच गोंधळ घालून शाळा सुरू करण्याची मागणी होती.