जालना : बहुजननामा ऑनलाइन टीम- जालना जिल्ह्यातील एका कुटुंबानं वयाच्या 14 व्या वर्षी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. नकळत्या वयात पालकांनी केलेल्या या कृत्यामुळं धक्का बसलेल्या मुलीनं लग्नानंतर अवघ्या 21 दिवसातच आपली जीवनयात्रा संपवली. काजल जीवाप्पा नामदे असं या मृत मुलीचं नाव आहे. जालना तालुक्यातील इंदेवाडी शिवारात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गावातील ग्रामसेवकानं फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं ?
ऑगस्ट महिन्यात लॉकडाऊन असतानाच नामदे आणि काटकर कुटुंबानं काजल नामदे या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह केला. या विवाहानंतर काजल खूप अस्वस्थ होती. अखेर 26 ऑगस्ट रोजी तिनं आत्महत्या केली. परंतु या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. 18 सप्टेंबर रोजी इंदेवाडीच्या नगरसेकांनी या प्रकाराबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं नामदे आणि काटकर कुटुंबातील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.