बहुजननामा ऑनलाइन टीम – भारताचे पहिले ऑलिंपिक पदकविजेते पै. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती(Chhatrapati Kha. Sambhaji Raje) यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली दरबारी आपण ही मागणी पोहाेचवू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताच्या पदरात पहिले ऑलिंपिक पदक टाकणारे महाराष्ट्राचे मल्ल पै. खाशाबा जाधव यांना आजतागायत पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले नाही. शासकीय पातळीवर क्रीडाविषय धोरणात असणारी अनास्था दूर व्हावी, यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे चळवळीच्या मदतीने संघर्ष करत आहेत. महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीनी या मोहिमेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिफारस पत्र देऊन सहभाग नोंदवला आहे. शिष्टमंडळाने खा. संभाजीराजे यांची भेट घेत दिल्लीच्या क्रीडा मंत्रालयाकडे तसेच पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत ही मागणी पोहाेचवावी, अशी विनंती केली. यावेळी संभाजीराजे यांनी दिल्लीत क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची भेट घेऊन लवकरात लवकर पै. जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे, बाबाराजे महाडिक, स्व. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांच्यासह शामराव जाधव, विक्रम जाधव, बाबा मुल्लाणी, अशोक शेट्टे आदी उपस्थित होते.