पालघर : बहुजननामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गट, पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे 50 कोंबड्यांचा गेल्या 3 दिवसांपासून संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पुण्यात तपासणीसाठी पाठवलेला अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आता जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं निश्चित झालं आहे. यानंतर आता प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
हा बर्ड फ्लूचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त होत असून मृत पक्षाचे अवशेष तपासणीसाठी पुण्याच्या रोगअन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले होते. पालघर शहरातील सुर्या कॉलनीत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 3 दिवसात 50 कोंबड्यांचा अचानक तडफडून मृ्त्यू झाल्याची घटना घडली.
एका पाठोपाठ अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोल्ट्री सील करण्यात आली आहे. 50 कोंबड्या दगावल्यानं पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळंच झाल्याचं अहवालावरून स्पष्ट झालं आहे.
बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं हे पहिलंच प्रकरण असल्यानं या रोगाला जिल्ह्यात अधिक पसरू न देता प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना आखत असल्याचं जिल्हा परिषद पशुधन अधिकारी डॉ. हिरवे यांनी सांगितलं आहे.