नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली. २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला असून या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यामुळे याची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जात आहे ? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे.
विद्यापीठाकडून एलएलबी प्रथम वर्षाच्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या गुन्हेगारी कायदा (लॉ ऑफ क्राईम ) आणि त्याचा पर्यायी विषय मालमत्ता कायदा (इंटेल्युक्युअल प्रॉपर्टी राइट्स) या विषयांचे पेपर फुटल्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे परत परिक्षचे आयोजने करण्याच्या सूचना विद्यापीठने प्रशासनाना दिल्या.
त्याचा त्रास विद्यार्थ्यांना देऊ नये, या प्रकरणास जबाबदार असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. यावेळी विद्यार्थी नेते अजिंक्य गिते, तुषार जाधव, वैभव वाक्चौरे, प्राजक्ता जोशी, महेश गायकवाड, कुणाल डोळस, सानिका कुलकर्णी, मयुरी जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.