पुणे : बहुजननामा ऑनलाइन – यंदा पावसाने ओढ दिली असली तरी काळजीचे कारण नाही कारण येत्या काही दिवसात पुण्यासह महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल अशी ग्वाही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या (आयआयटीएम) संचालकांनी दिली आहे अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
सध्या सर्वत्र कोवीड-१९ च्या संदर्भातच चर्चा, त्यावर उपाययोजना, त्या उपाययोजनांमार्फत या संसर्गाला प्रतिबंध अशाच विषयांवर लक्ष केंद्रित होत आहे. परंतु जुलै महिना संपत आला तरी देखील पावसाने ओढ दिल्यामुळे आता कोवीड थैमान घालत असतानाच दुष्काळालाही सामोरे जावे लागेल का? ही चिंता शेतकरी, उद्योजक, तसेच सर्वच क्षेत्रातील लोकांना भेडसावत आहे. याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी च्या संचालकांशी आमदार शिरोळे यांनी संपर्क साधून चर्चा करण्याची विनंती केली. त्या विनंतीला संचालक आणि शास्त्रज्ञांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार शिरोळे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्या चर्चेत इन्स्टिट्यूटचे संचालक आणि इन्चार्ज प्रो.रवि नंजुंधय्या, डॉ. ए.के.सहाय, डॉ.सूर्यचंद्र राव, डॉ.मुखोपाध्याय, डॉ.अश्विनी कुलकर्णी, डॉ.मुजुमदार, डॉ.थारा प्रभाकरन, डॉ.अनूप महाजन हे संचालक तसेच शास्त्रज्ञ चर्चेत सहभागी झाले होते.
पावसाने ओढ दिली असल्याने कृत्रिम पावसाची मागणी होत आहे. तशी सध्या गरज आहे का? असे आमदार शिरोळे यांनी विचारले तेव्हा चर्चेत सहभागी झालेल्या संचालक आणि शास्त्रज्ञांनी ग्वाही दिली की, यंदा पाऊस उशिरा सुरु होत असला तरी पुण्यासह महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पाऊस सुरु होईल आणि सरासरी इतका, कदाचित त्यापेक्षा जास्तही होईल त्यामुळे काळजीचे कारण नाही. कृत्रिम पावसाची गरज भासणार नाही.
महाराष्ट्राच्या काही भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे असे मत या संचालकांनी व्यक्त केले.
हवामानशास्त्रातील ज्येष्ठ संचालकांनी आणि शास्त्रज्ञांनी पावसाबाबत दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांनी, पुणेकरांनी पावसाबाबत काळजी करु नये असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. या चर्चेत सर्व संचालक आणि शास्त्रज्ञांनी भारतातील हवामानाची विस्तृत माहिती दिली.