मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. कारण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कबुली दिली आहे की, वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहे. आज दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. त्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी ही कबूली दिली. छाननी समितीत सुरवातीला वडेट्टीवार यांचं नाव घेतल नव्हतं. त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दिल्लीतून सूत्र हल्ली आणि वडेट्टीवार यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होत. या समितीचे अध्यक्ष मध्य प्रदेश काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे आहेत. बैठकीत राज्यातील २८८ मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.
छाननी समितीची ही पहिली बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये घेण्यात आली. या समितीची दुसरी बैठक ५ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी अटीच अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे असे वडेट्टीवार म्हणाले परत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली की, त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही.
कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे असे देखील वडेट्टीवार म्हणाले कारण आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत. कधी म्हणतात RSS संदर्भात भूमिका जाहीर करा, कधी म्हणतात चाळीस जागा घ्या, तर कधी म्हणतात राष्ट्रवादी सोबत आघाडी तोडा हे कसं चालणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्याला सोडणं कठीण आहे. संघाबद्दल तर आम्हीच स्पष्टच म्हटले होते की त्यांनी पत्रक तयार करावे आम्ही स्वाक्षरी करण्यास तयार आहोत.आम्ही अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मला आता वाटत नाही की त्यांच्या सोबत आघाडी होईल. ज्या पद्धतीने ते वागतात त्यावरून ते राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत येण्यामध्ये इच्छुक नाही असेच लक्षात येते त्यामुळे आम्ही कितीही प्रयत्न केले तर ते यशस्वी होणार नाही असे मला वाटते. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतचा चर्चांचा आता शेवट झाला आहे आम्ही आता त्यांच्यासोबत आघाडीबाबत सकारात्मक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होत की, काँग्रेससमोर १४४ जागांचा प्रस्ताव ठेवलाय. आघाडी करायची असेल तर चर्चेसाठी आमची दारं खुली आहेत मात्र काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही सर्व २८८ जागांवर आमचे उमेदवार उभे करु. परंतु आंबेडकरांना याची जाणीव आहे की, १४४ जागांचा प्रस्ताव काँग्रेस मान्य करणं शक्यच नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हंटले की, विजयी होण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच काँग्रेसचे तिकीट देण्यात येईल सोबतच ज्यांना निवडणुकीत पराभूत होऊ अशी शक्यता वाटते तेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत.