बहुजननामा ऑनलाइन टीम – कंपनीच्या गोदामात काम करताना विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडी तालुक्यातील वाशेरा गावातील एका कंपनीत शनिवारी (दि.26) सकाळी ही घटना घडली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची पडघा पोलिस ठाण्यात कुठलीच नोंद झाली नसल्याचे समोर आले आहे. एवढी मोठी गंभीर घटना घडून 40 तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रानडा , दिनेश वाघ ( सर्व रा, दाभाड) , अनंत दिवे ,विशाल भोईर व अजय निखंडे असे जखमी कामगारांची नावे आहेत. सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेले सर्व कामगार भिवंडी तालुक्यातील एका कंपनीच्या गोदामात शनिवारी सकाळच्या सुमारास काम करत होते. त्यावेळी त्यांच्या हातून धातूची शिडी कंपनीतील उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते दूरवर फेकले गेले. यात काही कामगार भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक कार्यक्रते अशोक सापटे यांनी दिली. तर पोलिसांनी घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.