बहुजननामा ऑनलाइन – राज्यात अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना(sugar factories )अर्थसहाय्य आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती संदर्भात सरकार लवकरच नवीन धोरण(sugar factories ) आखणार आहे असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी राज्यातील भाजप नेत्यांना दिलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल यांनी सोमवारी राज्यातील साखर उद्योगाच्या विविध मागण्यांसंदर्भात नवी दिल्लीत अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांपुढील अडचणींचा गोषवारा मांडला. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. केंद्र सरकारनं जर विशेष धोरण राबवून त्यांना अर्थसहाय्य केलं तरच यंदाच्या हंगामात हे कारखाने सुरू होतील आणि ऊस उत्पादकांच्या अडचणी दूर होतील असं भाजप आमदारांनी सांगितलं.
केंद्र सरकार याबद्दल लवकरच धोरण जाहीर करेल. साखर कारखाने वाचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासंदर्भातही साखर कारखान्यांना अर्थसहाय्यासोबत विशेष धोरण अपेक्षित आहे. याबद्दल लवकरच निर्णय घेऊ असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.