मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि देशात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामागचे कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचे नाव पुढे असल्याचे सांगितलं जात होते. दरम्यान, यावरती आता शरद पवार यांनी पहिल्यांदाच वार्ताहरांना बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले, “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असे त्यांनी वार्ताहरांना उद्देशून सांगितलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा पवार यांनी समाचार घेतला. “दानवेंच्या बोलण्याला काय महत्व द्यायचं. काही लोकांना कुठे काय बोलायचं याचे भान नाही, असे टीकास्त्र सोडत, यापूर्वीही त्यांनी असे वक्तव्य केल्याचे,” पवार यांनी सांगितलं.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. “शेतकरी आंदोलन येणाऱ्या काही दिवसांत अजून चिघळण्याची शक्यता आहे. तरी केंद्र सरकारने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नेते
यासंदर्भात वार्ताहरांना बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष बनले तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र, मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनी हे वृत्त नाकारले आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. परंतु, ज्यावेळी युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही. ही बाब जर शरद पवारांनी स्वतः सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नाही,” असेही त्यांनी म्हटलं.