बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच लस हाच कोरोनावरील उपाय असल्याचे म्हटले जात असून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच 1 मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. मात्र सध्या देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कार्यपध्दतीवर टिका केली आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलेही नियोजन न करता केवळ माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती चुकीची असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
देशात लसीचे उत्पादन कमी असताना इतर देशांना लस दिल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. आता हे सगळ सोडून देशासमोर जे कोरोनाचे संकट आले आहे ते निवारण्यासाठी केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचनाही मलिकांनी केली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेकडे लसीचा साठा अपुरा असल्याने सोमवारी 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सोमवारी नायर, बीकेसी, सेव्हर हिल, राजावाडी आणि कुपरमध्ये सुरू राहील. ज्यांनी यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यांनाच लस दिली जाईल. सध्या 63 केंद्रे, तसेच 73 खासगी रुग्णालये मिळून 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील. त्या ठिकाणी या वयोगटातील प्रत्येकी 500 नागरिकांचे रोज सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.