गडचिरोली : वृत्तसंस्था – मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत ११५ गुन्हे असलेला आणि २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता भास्कर याच्यासह ५ जण ठार झाले. या सर्वांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर ऋषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी (वय ४६) याच्यासह दोन महिलाही चकमकीत ठार झाल्या. पाचही नक्षलवाद्यांवर एकूण ४३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली.
२०१९मध्ये कुरखेडा भुसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या कटाचा भास्कर हा मुख्य सुत्रधार होता. भास्करचा मृत्यु हा माओवादी चळवळीसाठी मोठा हादरा आहे. मृतांमध्ये टिपागड दलमचा उपकमांडर सुखदेव नैतामचाही समावेश असून त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. तर प्लाटून १५ ची सदस्य असलेली सुजाता गावडे हिचाही मृतांमध्ये समावेश आहे. तिच्यावर १५ लाखांचे बक्षीस होते. या सर्व माओवाद्यांचे मृतदेह हॅलीकॉप्टरमधून गडचिरोलीत आणण्यात आले आहे.
मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी घातपाती कारवायाचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांच्या सी ६० पथकाला शनिवारी मिळाली होती. त्यादृष्टीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. जंगलात ४० ते ५० नक्षलवादी लपून बसले होते. त्यांनी सी ६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. अडीच ते तीन तास सुरु असलेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. अन्य नक्षलवादी जंगलात पसार झाले.
नक्षलवाद्यांकडील चार एके ४७ रायफल, एक १२ बोअर रायफल व एक ८ एमएम रायफल, एक लॅपटॉप तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जप्त केले आहे़