मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडं आज हवं तसं नेतृत्व नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठिण आहे असा दावाही राणेंनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर देखील निशाणा साधला.
नारायण राणे म्हणाले, “काँग्रेसच्या कार्यपद्धतीला नेते कंटाळले आहेत. त्यामुळंच पत्र पाठवून ते नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक सुरू आहे. परंतु अद्याप कुणाच्या नावावर एकमत होताना दिसत नाही.” नारायण राणे पुढे म्हणाले की, “राहुल गांधी देखील काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारायला तयार नाहीत. दुसऱ्या एखाद्या नावाची कुणी शिफारस करतानाही दिसत नाही. देशात आज काँग्रेसची परिस्थिती अत्यंत कठिण आहे. आज हवं तसं नेतृत्व काँग्रेसकडे नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठिण आहे.” असंही ते म्हणाले.
नारायण राणे म्हणाले, “काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षपदावर जेवढे वाद होतील तेवढं काँग्रेसचं खच्चीकरण होईल. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळेल. काँग्रेसमध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे. परंतु काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळण्याची क्षमता कुणातही नाही. जर त्यांच्यात क्षमता असेल तर काँग्रेस नेत्यांनी पुढं यावं आणि सांगावं आम्ही अध्यक्षपद सांभाळतो. परंतु एकाही तरुणाकडे तेवढी क्षमता आहे असं सध्या तरी दिसत नाही.” असं विधानही त्यांनी केलं.