मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणं राज्य शासनानं अनिवार्य केलं आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे मास्क न लावणाऱ्यांवर 9 एप्रिल 2020 पासून नियमित दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सोबतच मास्क वारण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. 9 एप्रिल 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्य 2798 नागरिकांकडून 27 लाख 48 हजार 700 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना मास्क विषयक दंडात्मक कारवाई ही विभागस्तरावर करण्यात येत आहे. 9 एप्रिल ते 31 ऑगस्ट या सुमारे 5 महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 4 हजार एवढा दंड के पश्चिम विभागानं वसूल केला आहे. त्या खालोखाल रुपये 4 लाख 21 हजार एवढा दंड आर दक्षिण विभागात तर रुपये 4 लाख 8 हजार 500 एवढा दंड सी विभागाद्वारे वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय 9 एप्रिल ते 31 ऑगस्ट या सुमारे 5 महिन्यांच्या कालावधी दरम्यान सर्वाधिक म्हणजेच 9 लाख 45 हजार एवढा दंड मे 2020 या महिन्यात वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 5 लाख 88 हजार एवढा दंड जून महिन्यात तर 4 लाख 82 हजार 700 एवढा दंड एप्रिल महिन्यात वसूल करण्यात आला आहे.