कोलकत्ता : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवल्यानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलत आहेत. मुकुल रॉयचे सुपुत्र शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल कांग्रेसचे दोन आमदार शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच पश्चिम बंगालमधील विविध क्षेत्रातील ४० स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्यही भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचा हात पकडनारे हे २४ सदस्य परगना जिल्ह्यातील असून कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती नगर पालिकाचे सदस्य आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार टीएमसीचे दोन सदस्य भाजपात प्रवेश करणार होते आता त्यांची संख्या तीन झाली आहे. त्यासोबतच काँग्रेसचे २ आणि माकपचा १ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. २०१४ मध्ये २ जाग्यावर निवडून आलेल्या भाजपने १८ जागा जिंकल्या आहेत. यात मुकुल रॉय यांची मोठी भूमिका आहे. मुकुल रॉय हे टीएमसीचे दिगज्ज नेता राहिले असून त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रॉय यांच्या रणनीतीमुळे भाजपाला पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळाले आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीच्या अटीतटीच्या लढतीतही टीएमसीने २२ जागा जिंकून गढ राखला. भाजपला १८ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या या विजयात मुकुल रॉय आणि बंगाल भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांची महत्वाची भूमिका आहे. परंतु दुसरीकडे भाजपच्या विजयामुळे ममता बॅनर्जीला घाम फुटला आहे. आठ वर्षांपासून सत्तेत विराजमान असणाऱ्या टीएमसीला भाजपने शह दिला आहे.
नुकतेच तृणमूल काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षाचे आमदार शुभ्रांशु रॉय यांना निलंबित केले. शुभ्रांशु रॉय हे मुकुल रॉय यांचे पुत्र आहेत, ते काही काळ तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या अगदी जवळ होते. पार्टीची प्रतिमा मालिन केल्याने शुभ्रांशु यांना निलंबित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या अंतर्गत अनुशासनाची कमतरता आहे आणि तृणमूलमध्ये नेत्याचे कोणीही ऐकत नाही अशी टीका मुकुल रॉय यांनी केली होती. मुकुल रॉय यांना इतर पक्षातील लोक भाजपात आणण्यासाठी ओळखले जाऊ लागले असून टीएमसीला उध्वस्त करण्याचा कामात ते आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यानंतरही रॉय यांनी कौशल्य दाखवीत विद्यमान तृणमूल खासदार अनुपम हजारा आणि सौमित्र खान यांनाही भाजपमध्ये आणले. त्यासोबत त्यांनी भाजपच्या बाजूने डाव्या पक्षांच्या काही नेत्यांनाही जोडले आहे.