बहुजननामा ऑनलाईन टीम – पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात दररोज ७० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता ही संख्या ३० हजारांच्या आत आली असली तरी संकट कायम आहे. राज्यातील लॉकडाऊन १ जून पर्यंत असल्याने बाधितांची संख्या आणखी कमी येऊ शकते. परंतु, अशातच राज्यावर आणखी एक नवे संकट आले आहे ते म्हणजे ब्लॅक फंगस. केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात ब्लॅक फंगसचे सुमारे ५ हजार ५०० रुग्ण आढळून आले. या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षात घेतली तर ७० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे या आजाराने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, पाच राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या आजारावर वापरण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी या औषधाची कमतरता भासू लागली आहे.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात
ब्लॅक फंगस या आजाराचे देशात पाच हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. यातील १२६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ९० जण हे महाराष्ट्रातील आहे. त्या पाठोपाठ हरयाणा १४, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आठ, झारखंड ४, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन, बिहार, आसाम, ओदिशा आणि गोव्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे. बिहारमध्ये ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसदेखील आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, काही राज्यांनी या आजाराची माहिती गोळा केली नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.