बहुजननामा ऑनलाइन टीम – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समजाच्या विरोधानंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) नियोजित 1200 पदांची भरती थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा (MPSC exam)लवकरात लवकर व्हावी, असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळा उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे.
डिसेंबर अखेर निर्णय होईल
मराठा आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरु आहे. डिसेंबरअखेर परीक्षेसंदर्भात (Exam) निर्णय होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यभरातून 1206 पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्ण परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रिका गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या तिन्ही परीक्षांतर्गत राज्यभरातून 1206 पदे भरली जाणार आहेत. त्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात होणारी परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्य सेवेची पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबरला तर अभियांत्रिकी सेवा 1 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला अराजपत्रिका गट ब ची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले. मात्र या परिक्षा होऊ शकल्या नाहीत.
चर्चा करुन लवकरच निर्णय
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या नियुक्त्या व नियोजन परीक्षांसंदर्भात तातडीचा निर्णय घेताना ‘एसईबीसी’तील विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ देता येईल का, असाही प्रस्ताव उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.