बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याने केंद्राने सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद केली होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. आता हेच जनजीवन सुरळीत करण्यासाठी आता सरकार पावले टाकत आहे. यासाठी वाहतूक सुरळीत करत आहेत. यातच प्रवासी रेल्वे सेवा अधिक क्षमतेने सुरू करण्याची योजना आखलीय. लॉकडाउनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हि योजना तयार केली आहे. या योजनेला राज्यांनीही संमती दिलीय. यात आता दोन दिवसात नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात येणार आहे.
कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे काही महिने रेल्वे रुळावर राहिली होती. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर केंद्राने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र, गर्दी टाळण्यासाठी नियमित एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या बंद ठेवल्या.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आता काळजी घेऊन घराबाहेर पडत आहेत. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असून काही महत्त्वाच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. वाढत्या रेल्वेगाड्यांच्या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनची संख्या वाढविण्यासाठी योजना तयार केलीय. ज्या मार्गांवर अधिक मागणी आहे, अशा मार्गांवर विशेष ट्रेन धावणार आहेत. तसेच नियमित आणि पॅसेंजर ट्रेन याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे बंद असणार आहेत.
ज्या भागातून अधिकच्या रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी होत आहे, तेथील प्रवासाचा भार कमी करण्यासाठी सध्याच्या 230 मार्गांशिवाय अधिकच्या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून यासाठी संमती घेतली आहे. तसेच पुढील चर्चा सुरू आहे. या ट्रेनची संख्या किती असणार? हे अद्याप सांगता येत नाही. या विशेष ट्रेनची घोषणा एक दोन दिवसांत करण्यात येणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.