पंढरपूरः बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवेढा येथून केली त्यावेळी बोलताना ते म्हणाले सरकार हे डोक्याने चालवायचे असते. मात्र, मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यात आहे असा घणाघात आंबेडकर यांनी आज मंगळवेढा येथे बोलताना केला आहे . वंचित आघाडीच्या पहिल्याच प्रचारफेरीला दलित आणि मुस्लिम महिलांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने काँग्रेस आघाडी आणि भाजप गोटात अस्वस्थता पसरल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना, पुलवामा हल्ल्यानंतर सगळे जग थांबण्यासाठी सांगत असताना कर्जबाजारी पाकिस्तानवर यांनी १४ दिवसांनी हल्ला चढवला. एकदम हल्ला केला खरा, पण निदान एखादा तरी दहशतवादी मारायचा होता, अशा शब्दांत आंबेडकरांनी सर्जिकल स्ट्राइकवर हल्ला चढविला. पुन्हा असाच गाढवपणा करीत देशाकडील गुपित फोडण्याचे काम केले आणि आपण किती महान नेता आहे, हे दाखवायचा प्रयत्न केला. पुलवामानंतर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे कर्जबाजारी पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आणि त्याने पाकिस्तानला २ लाख कोटी रुपयांची मदत केली, असा दावा आंबेडकर यांनी यावेळी केली.
नोटबंदीच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून आलेल्या ४० टक्के कमिशनची रक्कम आता निवडणुकात खर्च केली जाणार असून, पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मोदी-शाह जोडी बघत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या आलेल्या मतदानपूर्व चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा दाखवली नसली, तरी मला भेटलेल्या युतीच्या १८ उमेदवारांनी आपली लढत वंचित बहुजन आघाडीशी असल्याचे त्यांनी सांगितले, असे आंबेडकर म्हणाले. समाजातील दलित आणि मुस्लिम हे दोन वर्ग भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही मतदान करणार नसून, याचा सगळ्यात जास्त फायदा वंचिताला होणार असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.