मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार फार काळ टिकणार नाही, सहा महिन्यात पडेल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपला नाकारले आहे. येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे आपल्याला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Deputy Chief Minister Ajit Pawar) केला आहे. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले.
पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने ते विधानसभेत बोलत होते. विधान परिषदेत नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ती जागा भाजपने गमावली. त्याचा एका गटाला प्रचंड आनंद झाला, मात्र दुसरा गट अस्वस्थ झाला, असे सांगून पवार म्हणाले, पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला. धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल जरी निवडून आले असले तरी, ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. ते कधी परत येतील, हे कळणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.
ड्रेसकोडबाबत फेरविचार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करत आहे, असे ते म्हणाले. ओबीसी’समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
अन् अजितदादांनी मुनगुंटीवारांचे चॅलेंज स्वीकारले
माझ्या भाषणात जो अडथळे आणतो तो पुढल्या वेळी निवडून येत नाही, असे मिश्कील विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चला, मी घेतले चॅलेंज. पुढच्या निवडणुकीत मला हरवून दाखवा, यावर मुनगंटीवार निरुत्तर झाले.