मुंबई बहुजननामा ऑनलाईन- लोकसभेत झालेल्या चुका टाळून आगामी विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं, यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आघाडीला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘वंचित’ सोबत अद्याप आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नसताना आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
आगामी विधानसभेत महाआघाडीने आम्हाला सन्मानजनक वागणूक देत कमीत-कमी १० जागा द्याव्यात या जागा न दिल्यास आम्ही ५० जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,’ असा इशारा रिपाइंचे (गवई गट) नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान ,वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत येईल का ? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.