बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात महाविकसआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजप विरोधी पक्षच्या बाकड्यावर बसले आहे. त्यामुळे काल उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान समान कार्यक्रमावर सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.
‘शपथविधीनंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी नव्या सरकारने लपुन-छपून बहुमत सिद्ध करण्यावर भर दिला. मग बहुमताचे दावे कशासाठी ? या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली.
कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.
मग बहुमताचे दावे कशासाठी?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
तसेच फडणवीस पुढे म्हणाले कि, नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी ? स्वत:च्या आमदारांवर डांबून ठेव्याइतपत विश्वास नाही का ? भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का ? असा घणाघाती आरोप करत फडणवीस यांनी नव्या सरकारला उत्तर मागितले आहे.
भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?
महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
दरम्यान , महाविकसआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता तिन्ही पक्षात खातेवाटपावरुन चर्चा सुरु आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले आहे. परंतु काँग्रेस १२ ऐवजी १३ मंत्रिपदांची मागणी करत आहेत. नगरविकास, महसूल, वित्त यापैकी एक हवे. पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद मिळत नसेल तर त्यांना नगरविकास, वित्त किंवा महसूल यापैकी एक खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपदाबरोबर या तीनपैकी एक खाते मिळाले तर चांगले काम करता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसश्रेष्ठींना सांगितल्याचे समजते.
Visit : bahujannama.com