जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्ष मतदारांना आकर्षीत करण्यासाठी विविध घोषणा करत आहेत. यामध्ये शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जात असताना अद्यापही दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील अशा शब्दात गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही. आम्ही ते ओळखले म्हणून किती जागा येतील हे सांगू शकतो असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. मात्र, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेच्या घोषणाबाजीवरही भाष्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणार असल्याचे आश्वासन देत आहेत.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी गरिबांना दहा रुपयात थाळी आणि एक रुपयात आरोग्याची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे भाजप नाराज झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेवर बोलताना राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेण्यात येतील असे सांगत युतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचे पहायला मिळत आहे.
Visit : bahujannama.com