मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकार लॉकडाउन लावणार कि कठोर निर्बंध करणार यावरून सर्व लोकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ५ वाजता बैठक बोलावली आहे. तर या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तर बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे हे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात लॉकडाउन की कडक निर्बंध लागेल हे स्प्ष्ट होणार आहे.
राज्यातील करोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. मात्र, संपूर्ण लॉकडाउनऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कडक निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. तसेच, राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहील. परंतु, रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state on 2nd April, 2021 at 8:30pm
Facebook: https://t.co/2xokOekMo2#Maharashtra
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 2, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी करोनाची दुसरी लाट रोखण्याकरिता कठोर उपायांवर भर दिला होता. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले होते. या दरम्यान, राज्यात रुग्णसंख्या वाढत असून दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गुरुवारी २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ झाली असून त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.