हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत दोन विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी दिसून आली आहे. महायुतीमध्ये या दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत गेल्या. परंतु मागील काही वर्षांचा विधानसभा निवडणूकिचा आढावा घेतला, तर या दोन्ही मतदार संघात भाजप नेत्यांनी आपला जम बसवला आहे.
या विधानसभा निवडणुकीसाठी कळमनुरी मतदार संघात भाजपकडून माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे उमेदवारीसाठी इच्छुक होते. या मतदार संघात काम करून या नेत्यांनी भाजपला बळकट बनवले होते. युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपकडे हा मतदार संघ जाईल, या विश्वासाने या नेत्यांनी कामे केली होती. आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने माजी आमदार गजानन घुगे यांनी तर लाखोंचा निधी या मतदार संघात आणला होता तसेच कार्यकर्त्यांची फौज देखील तयार केली होती. पण युती झाल्याने शिवाजी माने आणि गजानन घुगे यांच्या आशेवर आणि प्रयत्नांवर पाणी पडले.
त्यामुळे नाराज झालेल्या या दोघांनी युतीला लाथ मारत उमेदवारी अर्ज भरला. अर्थात या बंडखोरांमुळे शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. कारण या दोन नेत्यांनी जर उमेदवारी मागे घेतली नाही तर संतोष बांगर यांना जब्बर फटका बसणार असल्याचे म्हंटले जात आहे.
वसमत विधानसभा मतदार संघ देखील शिवसेनेच्या ताब्यात देण्यात आला आहे. याठिकाणी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, २०१४ साली युती तुटल्यानंतर शिवाजी जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून तब्बल ५० हजार मते मिळवली होती. या बळावरच २०१९ ची विधानसभा निवडणूक लक्षात ठेऊन जाधव यांनी तयारी केली होती. मात्र, आता शिवसेनेने विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या शिवाजी जाधव यांनीसुद्धा भाजपशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजी जाधव यांची बंडखोरी झाल्याने माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना देखील चांगला फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांनी केलेली बंडखोरी ही शिवसेना उमेदवारांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Visit : bahujannama.com