नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत गुरुवारी तीन तलाक विधेयकावर जोरदार विवाद होताना दिसला. हैद्राबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाचा विरोध केला आहे. याशिवाय त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ओवेसी यांनी म्हटलं की, “इस्लाममध्ये लग्न एक कॉन्ट्रॅक्ट आहे. याला तु्म्ही जन्मोजन्मीचं नातं नका बनवू.
असदुद्दीन ओवेसी यांनी कडव्या शब्दात आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, “मी तिसऱ्यांदा या विधेयकाच्या विरोधात उभा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या विधेयकाला विरोध करत राहिल. तीन तलाकला या सरकारने गुन्हा ठरवलं आहे. अशात पुन्हा महिलेचं पालनपोषण कोण करेल ?”
पुढे ते म्हणाले की, “इस्लाममध्ये निकाहनामा आहे. तुम्ही एक अट ठेवा की, जर कोणी तीन तलाक दिला तर त्याला महिलेच्या मेहरच्या रकमेच्या 500 पट दंड द्यावा लागेल. इस्लाममध्ये लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्ही म्हणता की, ही जन्मोजन्मीची सोबत आहे. असं करु नका आणि आमचं म्हणणं समजून घ्या.”
ओवेसी म्हणाले की, “जर एखादा मुसलमान माणूस चुकून ट्रीपल तलाक बोलला तर लग्न तुटणार नाही.” त्यांनी दावा केला आहे की, “इस्लाममध्ये 9 प्रकारचे तलाक असतात. तीन तलाक त्यातील एक आहे. यामुळे महिलेवरील बोजा अजून वाढेल. जर नवरा जेलमध्ये गेला तर महिलेला पैसे कोण देणार ?”
पुढे ते म्हणाले की, “समजा कोर्टाने तीन तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांची शिक्षा दिली तर महिलेने तीन वर्ष त्याची वाट का पहात बसावं. महिला तीन वर्षानंतर असं म्हणणार का की, “बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है”.