मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.
देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे वाढलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार आता लॉकडाऊन लागू करण्यावर सरकारकडून तयारी केली जात आहे. लॉकडाऊन करावे लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.
दरम्यान, ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, विशेषत: वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच मृत्यूदर पुढे जाऊ नये वाढू शकतील. त्यामुळे ई-आयसीयू, व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.