पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील शिवाजीनगर येथे कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड हॉस्पिटल हे सुरु केल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सध्याही आठ दिवस होऊन झाले नाही तोपर्यंत एक नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत जम्बो हॉस्पिटलमधील सध्याच्या वैद्यकीय स्थितीबाबत जम्बोतील चार डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची यांच्या भेटीसाठी थेट बारामतीत गेले.
अजितदादा यांची भेट न झाल्यामुळे डॉक्टरांनी पत्राद्वारे तक्रार आणि मागण्या केल्याआहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच पुण्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत आहे. यामुळे प्रशासन, पुणेकर हे चिंतेत आहेत. यामुळे जम्बो पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाची आताची लाट पहिल्या पेक्षाही फार भयंकर आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना अतिदक्षता विभागातील बेड्स उपलब्ध होण्यात खूप अडचणी येत आहे. तसेच पुन्हा सुरू करण्यात आलेले जम्बो झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या सेवेत कमी पडत आहे. त्यात भर म्हणजे अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची भरती करण्यात आली असून तेथील मृत्युदर वाढला आहे. असे म्हटले आहे.
तसेच पुढे त्यात नमूद केले आहे, सद्य परिस्थितीत पहिले पाच महिने इथे कामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची पुन्हा भरती करण्यात यावी. परंतु पहिल्या ५ महिने काम केलेल्या डॉक्टरांचे पगार थकीत आहे. त्यामुळे तिथे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ काम करण्यास तयार नाही. परंतू, आता ICU मध्ये पुन्हा जुन्या डॉक्टरांची भरती करून त्यांचे पगार थेट महानगरपालिकेद्वारे करण्यात यावे असे त्यामध्ये नमूद करण्यात आले.
दरम्यान, यावरून तेथील अधिकारी म्हणाले, सर्व लोकांचे पगार करण्यात आले आहेत. काही संस्था वगळता सर्वांची बिल देखील देण्यात आली. या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पत्रावरची सही देखील संशयास्पद वाटत आहे. पगारावरुन चर्चा केली जात असतेच. सध्या जम्बो मध्ये ५०० रुग्णांने पुरेसा होईल इतका स्टाफ आहे. या जम्बोला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत आहे. जम्बो कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाशी कोणीही यासंदर्भात संपर्क साधलेला नाही. या संपूर्ण प्रकारावरून आम्ही पोलिसात तक्रार करत आहे. तसेच तपास देखील करण्यात येईल. असे अधिष्ठाता डॉ. श्रीयांश कपाले यांनी म्हटले आहे.