लातूर : बहुजननामा ऑनलाइन – लिंगायत महासंघाच्या वतीने लिंगायत समाजाचे राज्यव्यापी महाअधिवेशन व ९ वा राज्यव्यापी बसव महामेळावा शनिवारी (दि. २५ मे) व रविवारी (दि. २६ मे) लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊनहॉल) येथे होणार आहे, अशी माहिती लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांनी दिली.
मे महिन्यात होणाऱ्या राज्यव्यापी महाअधिवेशनासाठी अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व कर्नाटकचे मंत्री शामनूर शिवशंकरप्पा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, माजी मंत्री भिमण्णा खंड्रे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, खा. चंद्रकांत खैरे, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांच्यासह अनेक उद्योगपती, धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांच्या तारखाही निश्चित झाल्या आहेत. दोन दिवसांच्या या महाअधिवेशनात व ९ वा बसव महामेळाव्यात म. बसवेश्वरांचे विचार, ग्रंथदिंडी मिरवणूक, युवकांचे शिबीर, लिंगायत संत व साहित्यावर चर्चा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वचन साहित्याचे वाचन, लिंगायत आरक्षणावर चर्चा, महिला मेळावा, मनोरंजनाचा कार्यक्रम, सामूहिक लिंगपूजा, उद्योजकांचे मार्गदर्शन, समाजभूषण व जीवनगौरव व अक्का महादेवी पुरस्काराचे वितरण, लिंगायत साहित्याचे प्रदर्शन, चित्रांचे प्रदर्शन व महाप्रसाद आणि समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, राजकीय मान्यवर व साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लिंगायत समाज राज्यव्यापी महाअधिवेशनातून व ९ वा राज्यव्यापी बसव महामेळाव्यातून लिंगायत समाजाच्या सर्व स्थितीवर मंथन केले जाणार असून हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यासाठी एक पर्वणीच असणार आहे. लातूर येथे पहिले महाअधिवेशन होत असून यापुढे दर तीन वर्षांनी हे अधिवेशन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचे ठरले असल्याचे संयोजक तथा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांनी सांगितले. या कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या लेखक व वक्त्यांनी समाजसेवकांनी लिंगायत महासंघाच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.