सोलापूर बहुजननामा ऑनलाईन – केंद्राने लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यास नकार दिल्यानंतर लिंगायत समाज आता आक्रमक झाला आहे. १ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सर्व आमदार, खासदार यांच्या घरांसमोर धरणे आंदोलन करण्यात करण्यात आहे. असा निर्णय रविवारी सकाळी झालेल्या राज्यव्यापी बैठकित घेण्यात आला आहे.
मातोश्री स्व. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात भारतीय लिंहायत समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजपर्यंत स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. तरीही पदरी काहीच पडत नाही. म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याची ही बैठक आयोजित केली असल्याचे समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तूरे यांनी सांगितले.
यावेळी बंगळूरुचे पूज्य चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले, नागमोहनदास समितीच्या अहवालानुसार लिंगायत समाजाल स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा. या समितीचा अहवाल कोणीच नाकारू शकत नाही. दास समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्विकारायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा बसवेश्वरांचे विचार अन तत्वे सांगतात. त्यांनी बसवेश्वरांच्या संकल्पनेतील लिंगायत धर्माला मान्यता द्यायला हवी. नागमोहनदास समितीच्या अभ्यासासाठी केंद्राने १० तज्ञांची समिती नियुक्त केली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य, डॉ. बसलिंग पट्टदेवरू, जयमृत्यूंजय महास्वामी, शरणबसवलिंग महास्वामी आदी विविध मठांचे मठाधिपती, लिंगायत समाजातील मान्यवर आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.