बहुजननामा ऑनलाइन टीम – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळं आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली तर सत्ता सोडून असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलं आहे.
सध्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पक्षातील अंतर्गत वातावरण ढवळून निघालं आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळं आता नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी आता काही नेत्यांचा राहुल गांधी यांच्या नावासाठी पाठींबा आहे तर काहींचा मात्र आडमार्गानं विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनेक नेते आपापली मतं मांडताना दिसत आहेत.
विजय वडेट्टीवार यांनीही अशोक चव्हाणांप्रमाणे राहुल गांधी यांच्या नावाला पाठींबा दर्शवला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत राहुल गांधी फारसे अनुकूल नव्हते अशी चर्चा आहे. विजय वडेट्टीवरांनी यावरही भाष्य केलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत राहुल गांधी हेदेखील होते. त्यांनी सखोल चर्चा केल्यानंतरच महाविकास आघाडी सरकार स्थापण्यास होकार दिला होता. उद्या ते जर अध्यक्ष झाले आणि सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना केल्या तर आम्ही सत्ता सोडू” असंही विधान त्यांनी केलं.
इतकंच नाही तर गांधी घराण्यातील व्यक्तीच पक्षाचा अध्यक्ष व्हावा, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत राहू अशी ग्वाही देखील त्यांनी त्यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.