बहुजननामा ऑनलाइन टीम –कोल्हापूर येथील आजरा सहकारी साखर कारखान्याची ताब्यात घेतलेली साखर जिल्हा बँकेची आता डोकेदुखी ठरत आहेत. सप्टेंबरपासून एक पोतेही विक्री न झाल्याने बँकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आता निविदा मागवली असून त्या माध्यमातून आता विक्री केली जाणार आहे. आजरा कारखान्याच्या थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने कारखाना मालमत्तेचा ताबा घेतला आहे. त्यामध्ये १ लाख ७१ हजार क्विंटल साखरेचा समावेश आहे. ही साखर २०१७-१८ पासूनच्या हंगामातील आहे. त्यामुळे त्याची विक्री करणे गरजेचे होते. त्यानुसार बँकेने विक्री प्रक्रिया राबवली आहे.
मे ते ऑगस्ट २०२० अखेर ५३ हजार ९४० क्विंटल साखरेची विक्री झाली. आता ५७ हजार ७७६ क्विंटल साखर गोपामध्ये शिल्लक आहे. यामध्ये २०१७-१८ हंगामातील ३ हजार ९१० क्विंटल़ तर २०१८-२०१९ मधील ५३ हजार ८६६ क्विंटल साखर आहे. आजरा तालुक्यात जोरदार पाऊस असतो. त्यामुळे साखर ओलसर होऊन खराब होते. यामुळे साखर विक्रीसाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. आता बँकेने साखर विक्रीच्या निविदा मागवल्या आहेत.
केंद सरकारने ३१०० रुपये प्रतिक्विंटल साखरेची किंमत निश्चित केली आहे. त्याखाली विक्री करता येत नाही, मात्र तीन हंगामापूर्वीची साखर असल्याने ३१०० रुपयांनी साखर विक्री होत नाही. यासाठी बँकेने केंद्र सरकारकडे कमी किमतीत विक्री करण्यासाठी परवानगी मागितली आहे. बँक आता केंद्राच्या परवानगीच्या प्रतीकक्षेत आहेत.
दृष्टिक्षेपात आजराची साखर-
ताब्यात घेतलेली साखर – १ लाख ७१ हजार क्विंटल
विक्री – १ लाख १३ हजार क्विंटल
शिल्लक साखर – ५७ हजार ७७६ क्विंटल