मुंबई : बहुजननामाऑनलाईन – कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. तब्बल साडेआठ तास चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची कसून चौकशी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले आहे. ज्याप्रमाणे हसत ते सकाळी चौकशीसाठी हजर झाले होते त्याच प्रमाणे स्मितहास्य करत ते चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर पडल्याचे दिसून आले. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास राज ठाकरे पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहिण तसेच सूनेसह ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.
दरम्यान राज ठाकरेंनी चौकशीला सहकार्य करत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जर भविष्यात गरज पडली तर राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. उद्या त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही. कारण त्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंजकडे जाण्यासाठी रवाना झाले.