मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना यांना दरमहा 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. तसेच या भ्रष्टाचाराबाबत आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही माहिती दिल्याचा मोठा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात परमवीर सिंह यांनी म्हटले आहे, की, याच महिन्यात वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. मी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळी गृहमंत्री देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली आहे. तिथे उपस्थित असलेल्या अन्य मंत्र्यांना खरंतर ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले, असे सिंह यांनी पत्रात सांगितले.
सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्स यूनिटचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुख यांनी कित्येक वेळा वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख यांनी वाझे यांना सांगितले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत. त्यातील प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये गोळा केले तरी महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असे परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीनंतर सचिन वाझे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितले. मला त्याचा धक्का बसला. ही परिस्थिती कशी हाताळावी याचा विचार करत होतो. काही दिवंसापूर्वी सामाजिक सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. त्यावेळी पलांडे आत होते. केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40 ते 50 कोटी रुपये 1750 बार, हॉटेलमधून जमा होतील असे पलांडे म्हणाले, याची माहिती संजय पाटील यांनी मला दिली, असेही सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्री देशमुख अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट देत होते. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे काही खळबळजनक दावे परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात केले आहेत.
दरम्यान या प्रकरणानंतर भाजप अधिक आक्रमक झाला असून, या प्रकरणात परमबीर सिंहांना अटक करावी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.