बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात सुरु असलेल्या हक्कभंग, मराठा आणि धनगर आरक्षणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेषात ढोल वाजवत विधानभवनासमोर आंदोलन केलं होतं. या ठिकाणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेषात ढोल वाजवत केलेलं आंदोलन यावर (Sanjay Raut)सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला होता, यावरून गोपीचंद पडळकर यांनी सामानाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहून समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले पत्रातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर…
मी आपणांस खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्वोधन देऊन लिहू शकलो असतो, आपल्या दैनिकात माझा उल्लेख फेकूचंद केला यापद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही, प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच मुळात मी सामना वाचत नाही, परंतु सोशल मीडियामधून लेख पाहायला मिळाला, आपण जी अग्रलेखात मुक्ताफळे उधळली आहेत, ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे, त्या अग्रलेखात असे लिहिले आहे की, महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदांना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. मी अधिवेशनात धनगरी पेहराव करून गजी ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश, मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खाशी मी नाळ तोडलेली नाही, माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही तर हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण आपल्या सरकारने दिलेले नाही ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते, मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार, राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे, सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाजतरी कसा येणार ?
महाराष्ट्राला एकदाचं कळू द्या…
तसंच फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दागिनचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत तुम्ही आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? संजय राऊत, आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढे खासदार निवडून आलेत ते भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाटेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या
त्याचसोबत शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी मी काही विधाने केली तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता, ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात, माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता आपल्याला तीच उपाधी मीदेखील द्यावी असे राहून वाटते.